आम मुद्देताज्या घडामोडी

गाळप क्षमता वाढविण्याची पाथरी येथे शेतक-यांची मागणी

पाथरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाथरी तहसील कार्यालयावर काढला मोर्चा

संपादक अहमद अन्सारी. पाथरी येथील रेणुका शूगर्स साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात यावी,यासह इतर मागण्यांसाठी ऊस उत्पादक संघर्ष समिती, किसान मोर्चाच्या वतीने दहा डिसेंबर रोजी पाथरी तहसील कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला त्यानंतर तहसील कार्यालयासमोर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. पाथरी, सोनपेठ आणि मानवत या तीन तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात मागील दोन

महिन्यांपासून भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या भागात जवळपास 20 हजार हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे.त्यामुळे ऊस गाळपाअभावी शिल्लक राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.याच आंदोलनाचा भाग म्हणून दहा डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता बाजार समितीच्या प्रांगणातुन हा मोर्चा निघाला.

मुख्य रस्त्याने सेलू कॉर्नरपर्यंत आणि तेथून तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या मोर्चात कॉमब्रेड राजन क्षिरसागर, शिवाजी कदम, नवनाथ कोल्हे, विश्वनाथ थोरे, ज्ञानेश्वर काळे,प्रशांत नखाते,कैलास लिपणे, श्रीनिवास वाकणकर, मुंजाभाऊ लिपणे, नारायण दळवे, सुभाष नखाते,बाबा टेकाळे,भारत गायकवाड, ज्ञानेश्वर रबूद,सुरेश घागरमाळे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत लक्ष वेधले. तहसील कार्यालयासमोर उपस्थित मोर्चेकऱ्यांना विश्वनाथ थोरे,राजन क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर तहसील प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले

Share now