रेणाखळी येथे ऐन हंगामात वीज तोडल्याने शेतकऱ्यांत संताप
पाथरी प्रतिनिधी. पाथरी तालुक्यातील रेणाखळी ,हादगाव येथे शिवारातील शेतकऱ्यांचे विज खंडीत केल्याने संताप व्यक्त होत आहे,या वर्षी ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसाच्या खंडाने व परतीच्या पावसाने झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटलेले आहे त्यासाठी सरकारने काही अंशी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे.
अशा खडतर परिस्थितीत शेतकरी पुन्हा नव्याने रब्बी हंगामासाठी तयारीला लागला आहे ,पावसाळा भरपूर झाल्याने विहिरी,तलाव तुडुंब भरलेले आहेत म्हणून शेतकरी गव्हाच्या पेरणीसाठी शेत तयार करत आहेत . ऊस कारखाने सुरू झाले असून शेतकरी आपल्या उसाचे वजन वाढीसाठी पाणी देत आहेत . अतिवृष्टीने व पावसाच्या खंडाने उत्पन्न घटले असून आपले नुकसान रब्बी हंगामात भरुन काढण्यासाठी शेतकरी पुन्हा नव्याने कामाला लागला आहे, त्याच्या ह्या प्रयत्नात महावितरणने वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज खंडित करून खोडा घातला आहे. सध्या सोयाबीन ,
कापूस, हे पिक चांगल्या भावा अभावी शेतकऱ्यांच्या घरात पडुन आहे तर ऊस अजुन शेतातच उभा आहे.अशा परिस्थितीत ऐन हंगामात शेतकऱ्यांची वीज खंडित करून महावितरणने शेतकऱ्यांना खिंडीत पकडल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे . महावितरणच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे , सध्या राजकारणात सर्वच पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे भासवत स्पर्धा करीत आहे पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याबाबत कोणालाही स्वारस्य नसल्याचे शेतकऱ्यांत बोलले जात आहे .तरी खंडित केलेली वीज पूर्ववत सुरू करावी व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी शेतकरी वर्गातुन मागणी होत आहे