लोकशाहीचे बळकटीकरण करण्यासाठी मतदारांनी मतदान करावे. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे परभणी
सर्व भारत देशातील वयाची 18 वर्ष पुर्ण झालेल्या सर्व नागरिकांना भारतीय संविधानाने मतदानाचा हक्क प्रदान केला असून लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाने सक्षमपणे आपला मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. जबाबदार नागरिक व जागरुक मतदारांनी लोकशाही प्रक्रीयेचे बळकटीकरण करण्यासाठी प्राधान्याने मतदान करावे.
असे आवाहन प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी आंचल गोयल, हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधिक्षक जयंत मीना, महापालिका आयुक्त देविदास पवार, निवडणूक उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले की, शहराच्या
ठिकाणी एकाच इमारतीतील मतदारांची नावे एकाच ठिकाणच्या मतदान केंद्रांना जोडावीत ती वेगवेगळ्या ठिकाणी येता कामा नये. मतदार यादीतून नाव वगळणे, दुरुस्ती व नवीन नाव नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात शिबीरांचे आयोजन करुन सर्व नागरिकांना सोयीचे होईल असे पहावे. दिव्यांग मतदारांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करुन त्यांच्या अडचणी सोडविण्यात याव्यात याबरोबरच वेळोवेळी बीएलओंची प्रशिक्षणे आयोजित करुन त्यांच्या शंकाचे समाधान केले पाहीजे. संक्षिप्त
पुनरिक्षण कार्यक्रम मतदार याद्यातील त्रुटी दुर होवून परिपुर्ण मतदार यादी तयार व्हावी यासाठी घेण्यात येत असतो. मतदारामध्ये जनजागृती करण्याची फार मोठी गरज असून दक्षता घेवून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी कामे करावीत अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. नागरिकांनी आपल्या घरबसल्या व्होटर हेल्पलाईन या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपले नाव व इतर माहिती टाकुन मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करता येणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणारे संदेश व
दृकश्राव्य चित्रफिती या स्थानिक पातळीवरील सर्व व्हॉटसअप ग्रुप, टेलिग्राम व इतर सोशल मीडियातून व्हायरल करण्यात यावी जेणेकरुन नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होईल. असेही प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2022 ची पुर्वतयारी गरुडा ॲप, मतदार यादीतील तांत्रिक चुका, मतदार यादीतील छायाचित्र नसलेले मतदार स्वीप कार्यक्रम, युवा मतदार नोंदणी व दिव्यांग मतदार, मतदान जागृती अभियान तसेच वर्तमान पत्राच्या माध्यमातुन करण्यात आलेली जनजागृती आदींचा आढावा घेत योग्य त्या सुचना केल्या.या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, बीएलओ यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.